पुणे (प्रतिनिधी) : शासननामा न्यूज ऑनलाईन
एमपीएससी परीक्षेसाठी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ६५० जागा घोषित केल्या आहेत. या साडेसहाशे जागांत ‘एनटी क’ वर्गासाठी केवळ २ जागा राखीव आहेत. नियमानुसार ३.५ टक्के म्हणजेच किमान २३ जागा आरक्षित असणे आवश्यक होते. हा अन्याय दूर न केल्यास भाजप भटके विमुक्त समाज राज्यव्यापी आंदोलन करेल, असे निवेदन भाजप भटके विमुक्त आघाडी मार्फत पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आले.
एमपीएससीची परीक्षा ४ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ६५० जागा घोषित केल्या आहेत. यात एनटी क वर्गासाठी केवळ २ जागाच राखीव आहेत. वास्तविक नियमानुसार २३ जागा आरक्षित असायला हव्या होत्या.
या अन्यायामुळे एनटी क वर्गात येणाऱ्या धनगर आणि भटके विमुक्त समाजात रोष निर्माण झाला आहे. हा अन्याय दूर न केल्यास धनगर समाज व भाजप भटके विमुक्त आघाडी राज्यव्यापी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे तातडीने एनटी क वर्गाच्या जागा नियमाप्रमाणे वाढवून अन्याय दूर करावा अशी मागणीही केली आहे.
यावेळी भटके विमुक्त आघाडी महिला संयोजिका उज्ज्वला ताई हाके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्हा प्रभारी बंडू जायभाय, पुणे शहर महिला अध्यक्ष निता थोरवे, अलवासा फाउंडेशनचे सचिव सोमनाथ देवकाते उपस्थित होते.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली आहे.