
मुंबई, 12 जून: राज्यातील कोरोना (Corona Virus) संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. राज्यातील (Maharashtra Corona) कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र असं चित्र असलं तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती भयानक आहे. राज्यात असे सहा जिल्हे आहेत जिथे कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारला या जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रीत करावं लागेल.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसंच कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. दिवसेंदिवस या जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. एकीकडे राज्य अनलॉक होत असताना या सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे.
कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी परिस्थिती चिंताजनकच आहे. येत्या सोमवारपासून अनेक जिल्ह्यांचा स्तर बदलेल आणि त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात येतील. मात्र असं असताना राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला पश्चिम महाराष्ट्रातील तीन आणि कोकण विभागातील तीन अशा एकूण सहा जिल्ह्याकडे विशेष द्यावे लागणार आहे.