अमरावती : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
पोटदुखीचा आजार असल्याने डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार न घेता बाळाच्या पोटाला तप्त लोखंडी सळीने चटके दिल्याने खटकाली येथील दोन वर्षीय चिमुकल्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
खटकाली येथील दोन वर्षीय बालकाला त्याच्याच आजीने पोटाला गरम विळ्याचे चटके दिले होते. ही संतापजनक घटना घडल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती. तसंच चटके देणाऱ्या आजीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतरही बाळाच्या प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अखेर त्या बाळाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खटकाली गावातील राजरत्न जमूनकार असं मृतक बाळाचे नाव आहे. आजार झाल्याने त्याला रुग्णालयात न नेता घरीच पोटाला चटके दिले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने गुरुवारी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचाराला बाळाने प्रतिसाद दिला नाही, अखेर त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
अंधश्रद्धेतून धक्कादायक प्रकार
विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली तरी आजही आपल्या समाजातील एक मोठा वर्ग अंधश्रद्धेच्या विळख्यात आहे. मेळघाटासारख्या दुर्गम भागात अशा प्रकारांचं प्रमाण अधिक आहे. यातूनच मग आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे न जाता बोंधू बुआ-बाबा यांच्याकडे घेऊन जाणे, घरीच अघोरी पद्धतीने उपचार करणे, असे प्रकार घडतात. मेळघाटातही अशाच गोष्टीमुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर तरी या दुर्गम भागात प्रबोधन होऊन अंधश्रद्धेचा विळखा हटणार का, हे पाहावं लागेल.