सांगली : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी धनगर आरक्षण देण्यात भाजपचे तत्कालीन सरकार अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून टीका केली आहे. पडळकर म्हणाले की, संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही. संजय राऊत खातात शिवसेनेचं, पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असेही ते म्हणाले. आमदार पडळकर यांनी रविवारी सांगलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
रविवारी सकाळी शिवसेना खा. संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना बोलताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असे फडणवीस म्हणाले. परंतु यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यावरून महाविकास आघाडीवर भाजपने टीकेची झोड उठवली आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले. यावर काँग्रेसतर्फेही निदर्शने करण्यात आली. परंतु सत्ताधाऱ्यांनी निदर्शने केल्याने विरोधकांनी पुन्हा टीका केली आहे.
दरम्यान, आघाडीतील मतभेदांवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. सरकार चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. या यंत्रणेत तिन्ही पक्षाचे नेते घेण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे समन्वय साधण्याचं काम करतात. यामुळे आघाडीत व्यवस्थित सुरू आहे, असंही पवारांनी सांगितलं.