
हिंगोली : हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये भारताच्या वेगवेगळा भागातील बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून करोडो रुपये न लुटणाऱ्या टोळीला नांदेड, 3 मुंबई, दिल्ली आणि लखनऊ या भागातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
वसमत शहर पोलीस ठाण्यात संतोष बनवारीलाल सरोज (रा. बोर्डेपूर, तालुका मच्छली, जिल्हा जोनपुर (उत्तर प्रदेश) याने २०१८ साली वसमत (जि. हिंगोली) येथील एका बेरोजगार युवकाला रेल्वेमध्ये शासकीय नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून वेळोवेळी विविध बँक खात्यामार्फत व नगदी असे दहा लाख रुपये उकळले. पण अद्याप नोकरी न लावता त्याची फसवणूक केली होती. यासंबधी वसमत शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कमल ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
आरोपींनी फिर्यादीसारख्या अनेक बेरोजगार मुलांची फसवणूक करून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितल्याने गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत होती. त्यावरून पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ९ जून रोजी नांदेडच्या रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून छापा टाकला. यामध्ये आरोपी रवींद्र उर्फ राबिंद्र दयानिधी संकुवा (वय ४६ वर्षे रा. ओडिसा ह.मु. काटेमात्रेवली, ता. कल्याण, जि.ठाणे), अॅड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद (वय ५५, रा. लयरोपरुवार ता. कोपागंज, जि. महू, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेऊन अधिक तपास करण्यात आला.
या चौकशीत अनेक मुलांची फसवणूक केल्याची तसेच नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनऊ येथील साथीदारांमार्फत देशभरातील शेकडो मुलांचे करोडो रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याची त्यांनी कबुली दिली. या कारवाईत सहभागी असलेल्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचं नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी कौतुकही केले आहे.