
मुंबई: राज्यात आज करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक राहिली. गेल्या २४ तासांत ११ हजार ७६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ८ हजार १०४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मृतांचा आकडाही वाढला असून आज ४०६ रुग्णांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. राज्यात आतापर्यंत या संसर्गाने १ लाख ६ हजार ३६७ जणांचा बळी घेतला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )
राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या प्रमुख शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूंच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. त्याचवेळी कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत मात्र रुग्णसंख्या मोठी असल्याने व पॉझिटिव्हिटी दरही जास्त असल्याने चिंता कायम आहे. राज्यात आज मृत्यूंचा आकडाही वाढून ४०६ वर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेपुढे याबाबतचे आव्हान कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राज्यातील करोना रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून ९५ टक्क्यांवर जाऊन काहीसा स्थिरावला आहे.
करोनाची आजची स्थिती
– राज्यात आज ४०६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.८१ टक्के एवढा.
– आज राज्यात ११ हजार ७६६ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ८ हजार १०४ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ५६,१६,८५७ रुग्णांनी करोनावर केली मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४% एवढे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७६,११,००५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,८७,८५३ (१५.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात १०,०४,७७० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर ६,०२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
कोल्हापुरात रुग्णसंख्या वाढतीच
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या १ लाख ६१ हजार ७०४ इतकी असून त्यात सर्वाधिक २० हजार २९९ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर मुंबई महापालिका क्षेत्रात हा आकडा १७ हजार ९३१ इतका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतीच असून सध्या १६ हजार ९४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ८१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.