
अमरावती: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
मध्य प्रदेशातील दहेंदा रामखेडा गावातून महाराष्ट्रात आलेल्या लग्नाच्या वरातीचे पिकअप वाहन उलटून सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीतील बऱ्हाणपूर-धारणी या मुख्य महामार्गावरील काढाव फाट्याजवळ हा अपघात झाला. ( Amravati Accident Latest News )
वाचा: ‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य
अपघातात कमल नंदू पटोरकर (२०), जुन्यासिंग पटेल (५५), रामचंद सावलकर (५०), सोन्या बेठेकर (६६), हरिप्रसाद दहिकर (४५), तुळशीराम कासदेकर (४२) (सर्व (रा. दहेंदा रामखेडा, मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. मध्य प्रदेशातील दहेंदा रामखेडा गावातील किसन गुलाब दहिकर या युवकाचा धारणी तालुक्यातील घोटा मालूर येथील युवतीशी सोमवारी दुपारी बारा वाजता विवाह पार पडला. त्या विवाहाकरिता वरपक्षाकडून गावातील त्यांचे २५ नातेवाइक पिकअप वाहनाने व १५ महिला नातेवाईक बोलेरो वाहनाने घोटा गावात आले होते. विवाह पार पडल्यानंतर वरात मध्य प्रदेशकडे परतीच्या प्रवासाला लागली. मात्र, वरातीचे पिकअप वाहन धारणी-बऱ्हाणपूर मार्गावर काढाव फाट्याजवळ उलटले आणि आनंदावर विरजण पडले. वाहनातील काही वऱ्हाडी बाहेर फेकले गेले तर काहीजण आतच फसले.
पिकअप वाहनात फसलेल्या कुणालाही इजा न झाल्याने त्यांनीच तातडीने बाहेर येत जखमींना बाहेर काढले व रुग्णवाहिकेशी संपर्क साधून सर्वांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तेथील वैद्यकीय अधीक्षक रेखा गजरालवार, वैद्यकीय अधिकरी धनंजय पाटील यांनी त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू केले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे तर इतर चार जणांना गंभीर इजा झाल्या आहेत.