मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कांचन गिरी यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असे मत कांचन गिरी यांनी व्यक्त केले. मात्र, यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
हिंदुराष्ट्राच्या बांधणीसाठी राज ठाकरेंची भेट घेत असल्याचे कांचन गिरी यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कांचन गिरी आणि सुर्याचार्य दोघे मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या.
कांचन गिरी म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे.”
“उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते,” असा आरोप कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
कांचन गिरी यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. “राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील. राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत जो पूर्वग्रह झालाय तो मी दूर करेल. ते समजुतदार आहेत त्यामुळे ते हे समजून घेतील,” असेही कांचन गिरी यांनी नमूद केले.