
पण ऐश्वर्या-सलमानचे बिघडलेले नातं व त्यामुळे झालेले वाद कदाचित खान कुटुंब अद्याप विसरलेलं नाही. सलमानच्या आयुष्याशी संबंधित हे एकमेव नाते असे होते, ज्याने मोठ्या स्वरुपात नाट्यमय रूप धारण केलं होतं. अगदी कुटुंबीयांनाही पहिल्यांदाच मीडियासमोर येऊन सलमानच्या नात्यावर भाष्य करावं लागलं. यामध्ये सोहेल खानने थेट ऐश्वर्याचे नाव घेत तिलाच जबाबदार धरले होते.
ऐश्वर्याने सलमानबाबत केलं होतं ‘हे’ विधान

सलमान व ऐश्वर्याच्या नात्यातील वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले होते. अखेर बऱ्याच दिवसांनंतर ऐश्वर्या रायने २००२ साली टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या व सलमान खानच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं. तिनं म्हटलं की, ‘सलमान ब्रेकअप ही बाब मान्य करत नव्हता. नातेसंबंध तुटल्यानंतर सतत कॉल करायचा आणि काहीही बोलायचा. सह-कलाकारांसोबत माझे प्रेमसंबंध असल्याचीही त्याला शंका असायची’.
ऐश्वर्यानं असंही सांगितलं की, ‘कित्येकदा सलमानने माझ्यावर हात सुद्धा उगारला पण सुदैवाने शरीरावर कोणताही डाग राहिला नाही. यानंतरही मी शांतपणे कामावर जात असे. तसंच माझ्यासोबत काय घडलंय, हे कधीही कोणाला सांगितलं नाही’. अभिनेत्रीनेही असंही म्हटलं होतं की, सलमान स्वत:लाच इजा करून घ्यायचा. यानंतर मात्र मी त्याचा फोनला उत्तर देणे बंद केले’.
सोहेलच्या रागाचा उडला भडका

सोहेल खानला आपल्या कुटुंबीयांची फार काळजी आहे. तसंच सलमानच्या बाबतीत एखादं विधान करणंही तो टाळतो. पण ऐश्वर्याने उघडपणे वक्तव्य केल्यानंतर सोहेलच्या रागाचा भडका उडाला. तसंच संपूर्ण परिस्थितीस त्यानं ऐश्वर्या रायला जबाबदार ठरवलं. सोहेलेनं म्हटलं की, ‘ती आता सार्वजनिक ठिकाणी येऊन रडत आहे. पण जेव्हा ती सलमानसोबत होती आणि कौटुंबिक सदस्याप्रमाणे आमच्या घरी वारंवार येत होती, तेव्हा तिने कधीही त्यांच्यातील नाते स्वीकारले होतं?
तिनं असे कधीही केले नाही. तिच्यामुळे सलमानच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. ऐश्वर्याचं सलमानवर किती प्रेम आहे, हे त्याला माहिती होतं. पण तिनं कधीही ही बाब व्यक्त केली नाही’.
वचन पूर्ण न करणे

कित्येक नात्यांमध्ये एकवाक्यता, वागण्यामध्ये स्पष्टता नसल्याचंही पाहायला मिळतं. बहुतांश नात्यांमध्ये एका व्यक्तीकडूनच दुसऱ्याच्या तुलनेत वचन पाळले जाणे, प्रेम व्यक्त करणे आणि नात्याला पुढे नेण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचं दिसतं. पण एकतर्फी गोष्टींना योग्य प्रतिसाद न मिळाल्यास हळूहळू नात्यात नकारात्मकता वाढू लागते. यामुळे विविध नाट्यमय घडामोडी उद्भवू शकते. सलमान-ऐश्वर्याच्या नात्यात जे काही घडलं त्याचप्रमाणे गोष्टी घडू शकतात.
सर्व गोष्टींमध्ये स्पष्ट संवाद असणं गरजेचं

यासारख्या परिस्थिती टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सर्व गोष्टींविषयी तुमचे विचार स्पष्ट असणे आवश्यक आहे. असे केल्यास नात्यात असुरक्षिततेची भावना देखील निर्माण होणार नाही.
– एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही नातेसंबंधांमध्ये आहात, पण अद्याप लग्नासाठी तयार नसाल तर याबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडा.
– नात्याला थोडासा वेळ देऊन एकमेकांना अधिक जाणून घ्यायचे असेल तर तसंही मोकळेपणाने सांगा.
– नात्यातील अस्वस्थ करणाऱ्या मुद्यांवर संवाद साधणे गरजेचं आहे.
– जोडीदाराच्या दबावामुळे तुमची घुसमट होत असेल तर त्यापासून दूर पळण्याऐवजी थेट चर्चा करा.
– नात्यामध्ये कोणतीही सुधारणा होणे शक्य वाटत नसल्यास जोडीदाराशी संवाद साधून विभक्त होण्याचा निर्णय घ्या.
नकारात्मक व्यक्तीपासून दूर राहणंच योग्य

तुमच्या नात्यामध्ये काहीही उलट-सुलट घडत असेल तर संवाद साधून सर्व गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा. पण नकारात्मक भावनाच अधिक निर्माण होत असतील तर मग नाते संपुष्टात आणणं कधीही चांगलं.
गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडच्या खासगी आयुष्यात लुडबुड करणं, त्यांचा फोन तपासणे, न कळवता त्यांच्या ऑफिसमध्ये जाणे, लोकांसमोर स्वतःच्या नात्याबाबत चर्चा करणं, जोडीदाराला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणे, यासारख्या इत्यादी गोष्टी घडत असतील तर अशा नात्यात कोणाचीही घुसमट होण्याची शक्यता अधिक असते. तुमच्या जोडीदाराचंही वर्तन असंच असेल तर वेळीच सावध व्हा आणि नात्यातून बाहेर पडा.
ब्रेकअपनंतर असे वागणं टाळा

बरेच वर्षे एखाद्या नात्यात राहिल्यानंतर अचानक सारं काही संपुष्टात येते, त्यावेळेस परिस्थितीला कसे सामोरे जावे; याचं उत्तरच सापडत नाही. सर्वजण आपापल्या पद्धतीने गोष्टी हाताळू लागतात. तर काही लोक जोडीदाराला पुन्हा मिळवण्यासाठी धडपड करतात. काही जण भावनिकरित्या ब्लॅकमेल करणे, धमकावणे यासारख्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात.
सलमान-ऐश्वर्याच्या बाबतीतही असेच घडल्याचं संपूर्ण जगाने पाहिलं. प्रेमाच्या नावाखाली असे वर्तन कोणत्याही प्रकारे योग्य ठरू शकत नाही. तुमचा पार्टनर देखील असंच वागत असेल तर आपण कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमैत्रिणीची मदत घ्यायला संकोच करू नये.