
PCMC : मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आणण्याच्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ड्रीम प्रोजेक्टवर २०११ ला त्यांच्याच राज्य सरकारने बंदी आणली. भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंच्या (Mahesh Landge) प्रयत्नामुळे नुकतीच ती बंदी उठल्याने तो पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, माजी राज्यमंत्री आणि मावळचे भाजपचेच माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी या प्रकल्पाला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार ‘सरकारनामा’शी बोलताना सोमवारी (ता.११) केला.
त्यामुळे या योजनेचे भवितव्य पुन्हा लटकले असून पिंपरी-चिंचवडकरांना दुपारी मिळालेला दिलासा संध्याकाळी अल्पजीवी ठरला. भेगडे व त्यांचा पक्ष भाजपसह (BJP) शिवसेना आणि आरपीआय या तीन राजकीय पक्षांसह भारतीय किसान संघाने बंदी उठली असली, तरी पुन्हा ही योजना सुरू करण्यास आज विरोध केला. त्यांच्या आंदोलनामुळेच या योजनेवर २०११ ला बंदी आली होती. दरम्यान, ती नुकतीच उठली. तरीही वरील पक्ष आणि संघटनेसह स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिल्याने या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे कायम राहिले आहेत.
परिणामी पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी मिळण्याची आशा पुन्हा धूसर झाली आहे. ही योजना पूर्ण झाली असती, तर २०५० पर्यंत शहराचा पाणीप्रश्न मिटणार होता. पण, या योजनेला आपला शंभर टक्के विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार बाळा भेगडेंनी आज केला. तो कालही होता आणि आजही तसाच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०११ च्या आंदोलनातील तीन शेतकऱ्यांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. त्यासाठी सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून ही योजना रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.