
पुणे, 14 जून : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation)मुद्यावर खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje)आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची पुण्यात अखेर भेट झाली. या भेटीनंतर आम्ही दोघे एकाच घराण्याचे आहोत, त्यामुळे इथं वेगळा विषय येत नाही. मराठा आरक्षणासाठी दोन्ही घराणे एकत्र आली आहे, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
खासदार संभाजीराजे छत्रपती व उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. पुण्यातील औंध बॅनर रोडवर असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या मित्राच्या घरी ही भेट झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘आज बऱ्याच वर्षांनंतर आम्ही भेटलो. सातारा आणि कोल्हापूर घराणे मराठा समाजाच्या मुद्यावर एकत्र आलोय. या भेटीमुळे मनापासून आनंद झाला आहे. उदयनराजे यांनी परवाच भेट घेण्यासाठी बोलावले होते, पण तेव्ही भेट होऊ शकले नाही. पण आजही भेट झाली असून आनंद झाला आहे’ अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
तसंच, आम्ही सरकारसमोर सहा मागण्या ठेवल्या आहेत, समाज बोलला आहे, आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधी सुद्धा बोलले पाहिजे. आमच्या सहा मागण्या लवकरात लवकर मान्य करा, त्यावर तोडगा काढावा, अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.
तसंच, ‘अजित पवार हे छत्रपती शाहू यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेले असतील. ते भेटायला जातील याबद्दल माहिती नव्हते. जर या भेटीतून काही तोडगा निघत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मला व्यक्तिगत कल्पना नव्हती. पण पॅलेसमधून मला फोन आला होता. अजितदादांचा मला कोणताही फोन आला नाही’ असंही संभाजीराजेंनी सांगितलं.
संभाजीराजेंच्या मुद्यांशी मी सहमत -उदयनराजे
‘आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे’ असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
‘या देशाची फाळणी करायची आहे का, असा माझ्या राज्य आणि केंद्रावर आरोप आहे. 23 मार्चला जीआर काढून आरक्षण दिलं जात आहे. मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दुफळी निर्माण केली जात आहे’ असा आरोपही उदयनराजे यांनी केला.
‘व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, आम्ही कोणतेही कृत्य कधी केले नाही. कोर्टात काय होईल, काय निर्णय येईल, याकडेच यांचं लक्ष आहे. यांना समाजाशी काही घेणे देणे नाही. व्यक्ती केंद्रीत राजकारणी झाले आहे. आज यामुळे मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला तर याला सरकारच जबाबदार राहणार आहे. मी आणि संभाजीराजे सुद्धा तेव्हा काही करू शकणार नाही. आमच्यावर सुद्धा घणाघात हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे अशी वेळ येऊ देऊ नका’ असा इशाराही राजेंनी दिला.