पुणे, 11 जुलै: महाविकास आघाडी सरकारचे (MVA government) मंत्री आणि आमदारांच्या विरोधात ईडीचा ससेमिरा लागला आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावला आहे. पण, मी खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, एखाद्या माणसाला संपवण्यासाठी ईडीचा वापर हा चुकीचा आहे, असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी व्यक्त केलं.
पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.
‘मी एकनाथ खडसे यांच्या सीडीची वाट पाहत आहे. खडसे म्हणाले होते कि, माझ्यामागे ईडी लावली तर सीडी लावीन, त्यामुळे ते सीडी कधी लावणार याची वाट पाहतो. याच्याआधी सुद्धा तपास यंत्रणाचा चुकीच्या पद्धतीने वापर झालाय. काँग्रेसच्या काळात सुद्धा याचा वापर झाला आहे. आता भाजपच्या काळात सुद्धा ईडीचा वापर होत आहे, मुळात एखाद्या माणूस आपल्याविरोधात गेला म्हणून त्याला संपवण्यासाठी यंत्रणेचा वापर चुकीचा आहे’, असं राज ठाकरे म्हणाले.
‘मराठा आरक्षणाच्या वेळी आघाडीचे सरकार होते. त्यावेळी मुंबईतून मोर्चा निघाला होता. त्या मोर्चात सर्वच नेते गेले होते. सर्वांना मान्य आहे मग आडलंय कुठे, मराठा समाजातील तरुणी आणि तरुणांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. जर केंद्रातील आणि राज्यातील सरकारला सुद्धा मान्य आहे तर मग अडलं कुठंय, आपण जे बोलतोय, ज्या बातम्या येत आहे, हे सर्व वरवरचं आहे. सर्वच मान्य असेल तर अडवलं कुणी? पण मुळात कोर्टामध्ये याची बाजू व्यवस्थित मांडली का जात नाही. हा काही आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न नाही. हे केंद्रामुळे होतं, राज्यामुळे होतं, असं कुणी म्हणू शकत नाही. सर्वांना एकदा व्यासपीठावर बोलावून नेमकं काय ते विचारलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
‘आता समाजाने याचा विचार करायला पाहिजे. जेव्हा मराठा समाज भरभरून मतदान करतो, त्यावर ही लोकं निवडून येतो. समाजाचा फक्त वापर केला जातो. मत मागण्यासाठी आल्यावर लोकांनी आपल्या प्रश्नांबद्दल लोकप्रतिनिधींना विचारलं पाहिजे’, असं परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
‘या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात सरकारचे कामकाज पाहण्यास मिळाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कामकाजावर समाधान व्यक्त करता येणार नाही’, असंही राज ठाकरे म्हणाले.
‘पुणे महापालिका निवडणुकीला अजून वेळ आहे. कोरोनाच्या काळामुळे आधीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निवडणूक व्हायला पाहिजे. पण आधीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहे, पुढ काय होईल काही सांगता येत नाही त्यावेळी निर्णय घेऊ’, असंही राज ठाकरेंनी सांगितलं
‘मी नवी मुंबई विमानतळाबद्दल माझी भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव हे कायम आहे. मी काही तिसरी मागणी केली नाही. उद्या जर मी पुण्यात राहण्यासाठी आलो तर राज मोरे होणार नाही’, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.