
पुणे, 21 जून : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (shiv sena mla pratap sarnaik letter) यांनी ‘भाजपसोबत युती करावी’ अशी मागणीच पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि शिवसेना (Shivsena) युतीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ‘भविष्यात युती होऊ शकते, त्याचा आम्हाला आनंद होईल’ असं सूचक विधान भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी केलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना गिरीश बापट यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर आपली भूमिका मांडली आहे.
शिवसेना आणि भाजप गेल्या 25 वर्षांपासून एकत्र होते. नंतर अनैसर्गिक लोकांमुळे आमची तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते. जर युती झाली तर आम्हाला त्याचा आनंद होईल. प्रताप सरनाईक आत्ता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचाय, असं आवाहनच बापट यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.
‘कोणत्याही व्यक्तीवर अथवा पक्षावर कुठलीही कारवाई भाजप करत नाही. तपास यंत्रणा त्या कारवाई करत असतात. मुळात भाजप गरीब पार्टी आहे, ती कारवाई नाहीतर लोकांना मदत करणारी पार्टी आहे’ असं गिरीश बापट म्हणाले.
‘प्रताप सरनाईक यांनी जे पत्र लिहिले आहे. त्यातून शिवसैनिकांची खदखद बाहेर आली आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्या भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रताप सरनाईक यांची बोलकी प्रतिक्रिया देते आहे, असं बापट म्हणाले.
‘पुणे पालिकेच्या निवडणुकीत आमचं प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्रातला एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही. अजितदादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होतं, पण कार्यकर्ते ऐकत नाही हे माहिती झालं. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक आहे, असा टोलाही बापट यांनी लगावला.
युतीचा निर्णय मोदी-शहा घेतील – चंद्रकांत पाटील
दरम्यान, जुन्या मित्रासोबत जाण्याबाबत व्यवहारात आणण्याची शिस्त नसते. त्याबाबत निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.
रोज सकाळी समाजातील विविध विषयांवर टिपणी करायचा अधिकार आहे. सरकारमध्ये समनव्य आहे का जनतेला दिसत आहे. नाना पटोले काय बोलतात सरनाईक काय बोलतात कानात कोण काय बोलतं, ज्या दिवशी जे व्हायचं ते होणार आहे, असंही पाटील म्हणाले.
शिवसेना आमदार आणि खासदारांना वाटत असेल तरी ते प्रत्यक्षात येण्याची शिस्त नाही. आम्हाला काय वाटत ते प्रत्यक्षात आणण्याचे काम अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. आम्हाला वाटलं मैत्रीचा हात पुढे आला तो स्वीकारायचं का हा निर्णय पक्षश्रेष्ठी ठरवतील, असंही पाटील यांनी सांगितलं.